11/24/2009

मोतिया भजी उर्फ मिर्ची वडे

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 
८-१० मोठ्या पोपटी हिरव्या मिर्च्या
३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून
लाल मिर्ची पावडर,
गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर,
चाट मसाला,
कोथिंबीर धूउन बारिक चिरून
मीठ
बेसन पीठ
चिमुट्भर खा. सोडा

क्रमवार पाककृती: 
  1. मिर्च्यांचे देठ न काढता मिर्चीला मधे चीर देउन बिया काढून थोड्या मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात.
  2. बटाटे सोलून किसून किंवा मॅश करून त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चिमूट्भर आमचूर पावडर, मिठ, चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाले एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे.
  3. मिर्च्या पाण्यातून काढुन घेउन निथळून त्यात वरिल प्रमाणे तयार केलेले सारण गच्च भरावे.
  4. एका भांड्यात बेसन, चविपूरते मीठ, चिमूट्भर सोडा घालून भजीसाठी भिजवतो त्या प्रमाणे पण थोडे घट्टसर पिठ भिजवावे.
  5. कढईत तेल चांगले तापवून मग मध्यम आचेवर बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून मिर्च्यांचे वडे तळावेत.
  6. चिंच खजूराच्या गोडसर चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावेत. स्मित
वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे 

अधिक टिपा: 
  • मिर्च्या घेताना कडक ताज्या मोठ्या घ्याव्यात. मोठ्या मिर्च्या कमी तिखट असतात.
    तशीही ह्या मिर्च्यांना खास चव नसते. म्हणूनच सारणात लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही वापरावे.
  • देठ न काढता मिर्च्या तश्याच ठेवल्याने तळताना सोप्पे जाते.
  • बेसन पिठात शक्यतो तिखट किंवा हळद घालू नये. तळल्यावर काळपट दिसतात.
    चविसाठी ओवा-जिरा पूड वापरू शकता.
  • हे वडे मध्यम आचेवर तळल्याने एक्दम खमंग होतात.
  • पार्टीसाठी वेरिएशन म्हणून बेसनाच्या बॅटर मधून बुडवून मग भिजवलेल्या साबुदाण्यात घोळवले की मोतिया भजी सारखे दिसायला सुंदर दिसतात. व वर चिकटलेल्या साबुदाण्यांमुळे छान लागतात.

10/20/2009

संवाद अजय्-अतुल यांच्याशी

मायबोली दिवाळी अंकाचे यंदाचे दहावे वर्ष. दिवाळी संवाद निमित्त्याने अजय-अतुलशी झालेली ही बातचित इथे देत आहे.

-----------------------------

बस नाम ही काफी है ! असं आपण म्हणतो ना, काही नावं अशी असतात कि त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं असतं. अश्याच एका तरूण जोडीने मराठी मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ती जोडी म्हणाजे अजय अतुल.

आज मराठी माणसाला अजय अतुल ची ओळख करून देण्याची खरंच गरज नाही. ह्या दोघा भावांनी आपल्या अफाट प्रतिभेने व अथक परिश्रमाने संगीत क्षेत्रात आपलं एकमेवद्वितीय असं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांत ह्या जोडीने संगीत क्षेत्रात जणू काही क्रांतीच घडवून आणली आहे. मराठी चित्रपटगीतांना तर नवा श्वासच दिला. दर्जेदार, प्रयोगशील आणि तितक्याच यशस्वी रित्या गाणी संगीतबद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दर्जेदार संगीत देण्याकरीता त्यांनी नुसताच वाद्यांचा मेळ घातला नाही, तर त्यांचा गाण्यांमध्ये लय-ताल-सूरांचे असे काही जादूई मिश्रण आहे की सान थोरांच्या मनाचा केव्हा ठाव घेतात ते कळतही नाही.

लोकांना वेगळं पण चांगलं काय देता येईल ह्याची उत्कृष्ठ जाण ह्या दोघा बंधूंना आहे. प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात दिलेल्या संगीतात मराठी लोकसंगीतापासून भावगीत, रॅप, हिप-हॉप, रॉक अशा सगळ्याच प्रकारांचा अत्यंत उत्कृष्टरीत्या वापर केला आहे.

ह्या जोडीच्या कामाची सुरुवात प्रारंभी विनती करत बाप्पाच्या गाण्यांनीच झाली. विश्वविनायक ह्या जगप्रसिद्ध अल्बम मध्ये अगदी पारंपारीक आरती, स्तोत्रंही वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. आणि ह्या वेगळेपणामुळे हा अल्बम जगात सगळीकडे आपलासा झाला.

संगीतकाराबरोबरच एक चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक कॉम्बो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्याला त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो. त्यांनी संगितबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्‍यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’ मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वा-याचे’ हे गाणं असो किंवा 'जत्रा' मधली कोंबडी, दे धक्का, साडे माडे तीन, उलाढाल, जोगवा, बेधुंद, एक डाव धोबी पछाड, सही रे सही किंवा लोच्या झाला रे सारखी मराठी नाटकं, सिरियल्स ची टायटल सॉन्ग्स, अनेक हिंदी चित्रपट, झी मराठी चे गौरवगीत..अगदी हिंदी, मराठी च्या पलिकडेही जाउन तेलगु चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. ही यादी खरंच न संपणारी आहे .....

मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही ? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्माण केली. इतकेच नाही, तर एस. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, रिचा शर्मा, सुजाता अश्या अनेक अमराठी गायकांकडून मराठी गाणी गाउन घेतली आहेत.

अनेकोनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. अश्या ह्या हरहुन्नरी सर्वस्पर्शी संगितकार द्वयींशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी केलेल्या ह्या अनौपचारीक गप्पांतून त्यांच्या कारकीर्दीचा आणि व्यक्तीमत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

संपदा : विश्वविनायक हा तुमचा पहिला अल्बम, या बद्द्ल आम्हाला थोडं सांगाल का ? या मागची प्रेरणा काय होती ?

विश्वविनायक केला त्याला दोन कारणं आहेत एक म्हणजे म्हणजे प्रचंड राग होता...

अतुल : सुरुवात अशी झाली होती की तो काळ असा होता गायत्री मंत्र केला ..म्हणजे अगदी गायत्री मंत्र नाही, १०८ वेळा गायत्री मंत्राची किंवा कुठल्याही नामस्मरणाची कॅसेट, अश्या कॅसेट लाउन आवाज बारिक करून तुझ्या मनात नामस्मरण होणार आहे का ? स्वतः केलं तर त्याचा लाभ होतो. दुसरी गोष्ट पिक्चर च्या गाण्यांचा चालीवर गणपती बाप्पाची गाणी यायची आणी ती विकायचा प्रयत्न करायचे लोक. अगदी जुम्मा चुम्मा देदे आणि चोली के पिछे च्या चालीवरही गणपतीची गाणी निघाली होती.

तेव्हा आम्ही विचार केला...आचार्य अत्र्यांचं एक वाक्य आहे,"भारतातल्या इतर प्रांताना नुसताच भूगोल आहे.. पण आपल्या महाराष्ट्राला प्राचिन इतिहासही आहे !". आणि साहित्याबद्दलही तेच आहे शेकडो वर्षांपूर्वी, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली, ओम नमो जी आद्या सारखी काव्य लिहिली असे आपले प्रगल्भ साहित्य असतानाही आपण ह्या अश्या उथळ गोष्टी करायच्या का?
आपल्याला एवढी समृद्ध संस्कृती लाभलेली असतानाही आपण मात्र ही अशी चित्रपट गीतांवर आधारलेल्या गाण्यांतून देवाला स्मरतो आहे. आणि बनवणारे पण कोण ? ज्याना आम्ही फॉलो करतो तेच संगीतकार. खूप वाईट वाटलं.

देवांचा आदिदेव गणपती त्यासाठी काहीतरी करायची एक आंतरीक इच्छा होती. आपला देव केवळ आपला न रहाता तो सर्वांचा व्हावा असा त्या मागचा दृष्टिकोन होता. १४ विद्या ६४ कलेची देवता गणपती. प्रत्येक मूर्तिकाराला एकदा तरी त्याची मूर्ती घडवावी वाटते. चित्रकाराला सुंदर गणेशाचं चित्र काढावसं वाटतं. तसंच आम्हालाही आमच्या संगीतातून गणेशाला सादर करावसं वाटलं. मग जवळ जवळ दोन वर्ष गणपतीच्या पुराण कथा, स्तोत्र, आरती ह्याचा आम्ही अभ्यास केला. मग आपला हा लाडका देव फक्त मराठी हिंदी भाषिकांपुरता किंवा भारतापुरता मर्यादित न रहता तो त्याहीपलिकडे सातासमुद्रापार जाउन सर्वश्रुत व्हावा.. सगळ्यांचा लाडका व्हावा ह्या अपेक्षने विश्व विनायकची निर्मीती झाली. त्यासाठी प्रेरणा बाप्पानेच दिली. कर्ता करविता तोच !

संपदा : विश्वविनायक पहिलाच अल्बम हिट झाला, प्रसिध्दी मिळाली तेव्हा कसं वाटलं ?

नाही तो लगेच हिट नाही झाला. अल्बम रिलिज झाला तो अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जन झाले, सहा महिने, वर्ष लोट्लं तरी काही नाही. आमचं स्ट्र्गल चालू होतं. काही काम नव्हतं. आम्हाला वाटलं होतं आमची तेजाबची माधूरी दिक्षीत होईल, एका रात्रीत स्टार ! आम्हाला वाट्लं होतं तसं झालं नाही.

पण बाप्पचा अशिर्वाद होता. दोन वर्षात आम्ही केलेल्या कामाची माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. कुणी गणपतीत १०० सिडीज वाटल्या, कुणी कुणाला गिफ्ट दिल्या, एकाला आवडलं दुसर्‍याला सांगितलं. आणि यश कणाकणानं दबक्या पावलांनी आलं. आमच्या यशाचं श्रेय विश्वविनायकलाच. विश्वविनायकनेच आमची खरी ओळख निर्माण केली.


संपदा : शंकर महादेवन, एस. पी. बालसुब्रमण्यम ह्या सारख्या दिग्गजांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता ? पहिलाच अम्बम असल्यानं काही दडपण होतं का ?

दडपण तर होतं. ही दोन्हीही माणसं प्रचंड अभ्यासू आहेत. दोन्ही दिग्गजांनी आमची मेहनत बघितली. आमची कामविषयीची कळकळ पाहिली आणि त्यांनीही स्वत:ला झोकून दिलं. एकुणच अनुभव फार छान होता. आम्ही चांगले मित्र बनलो. शंकर स्वतः एक संगीतकार असून देखिल आमचे ट्युनिंग उत्तम जमते.

संपदा : संगीत क्षेत्रातच काम किंवा संगीतातच करियर करावं असं कधी वाटलं ?

अगदी लहानपणापासून ! शाळेत असल्यापासून आम्ही स्वतःकडे संगीतकार म्हणून पाहतोय. म्हणजे करियर करायचं होतं असं नाही पण आपण संगीत द्यायचं हे लहानपणीच ठरलं होतं.

अजय : अगदी दोघांनी नाव कसं ठेवायचं हे सुद्दा ठरलं होतं.

अतुल : माझ्या शाळेच्या वहीची मागची कित्येक पानं ऑटोग्राफ कसा द्यायचा त्याच्या प्रॅक्टीस ने भरलेली. अजूनही ती वही आहे माझ्याकडे.

संपदा : तुम्ही जेव्हा संगीतात करियर करायचं, असं घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती ? की हे सहज होत गेलं ?

आई बाबांची प्रतिक्रिया चांगली होती. वडीलांचं आधिपासूनच मत होतं, जे काही कराल ते मनापासून करा. पैसा कमावण्यासाठी करू नका. नाहीच जमलं तर दोन सुखाचे घास खाण्याइतकी आपली परिस्थीती नक्कीच आहे. ह्या क्षेत्राबद्दल त्यांना काही माहित नसतानाही त्यांनी आम्हाला कधी विरोध केला नाही. त्यांचा आधार होताच.

आधी सांगितल्याप्रमाणे संगीतकार व्ह्यायचं हे लहानपणापसूनचं ध्येय. पण मग शाळा कॉलेज संपल्यावर इतर लोकांसारखं नोकरी शोधा कंप्युटर शिका असे उद्योग करत करत आम्ही पुण्याच्या काही लोकल गृप्स सोबत गाण्याच्या व लोककलेच्या कार्यक्रमात वादक, गायक, नर्तक म्हणून भाग घेत असू. काही ना काही अ‍ॅक्टीव्हीटीज सुरू होत्या. पण बोलणारे बोलतही होते.. काय तुमची मुलं काय करणार आहेत पुढे वगैरे...पण आपले रक्त आहे ते कधीच वाया जाणार नाही ह्याची आई बाबाना खात्रीच होती.

नंतर पुण्यात काही छोटे मोठे कार्यक्रम, अ‍ॅडव्हरटाइज ची जिंगल्स, मग धार्मिक अल्बम्स असं करत करत कामाला सुरवात झाली.

संपदा : संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेतलंय का ? तुमचे गुरु कोण ?

नाही शिक्षण असं काही घेतलेलं नाहिये. प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिकत गेलो. खास गुरू असं कोणीही नाही.

संपदा : शास्त्रीय रागदारीवर आधारित अशीही गाणी बसवलीत का?

आम्ही काही शास्त्रिय शिक्षण घेतले नसल्याने रागावर आधारीत तशी गाणी बसवली नाही. खरं सांगायचं तर गाणं आमच्या मनामध्ये वाजतं. त्या गाण्याच्या वातावरणाशी जे भिडतं तसं ते गाणं बनतं. आता आता तरी आमच्या स्वतःच्या अभ्यासाने आम्हाला थोडं फार समजतंय. पण विश्वविनायकच्या वेळी तर लोकांनी सांगितलं की अरे हे तुम्ही तिन रागांचं मिश्रण केलं आहे. मग चालत नाही का तसं ? चालतं ना. जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते केलं. त्यामुळे झालं असं की एका सुरावटीतून दुसर्‍या सुरावटीत असा त्या गाण्याचा प्रवास झाला. आणि एक समजलं, काहीच माहिती नसण्यामुळे आम्ही आज हे वेगळे प्रयोग करू शकलो. नाहितर आम्ही थिरोटीकली कुठेतरी बांधले गेलो असतो. अरे हे असं चालत नाही ह्यात कसा कोमल सूर लावायचा ? पण जे कानाला चांगलं वाटतं ते संगीत. जे काळजाला भिडतं आणी आत्म्याला अंतरमूख करतं तेच खरं संगीत.

संपदा : एखादी चाल डोक्यात घुमत असेल आणि पूर्णत्वास जात नसेल, तर त्रास होतो का?

हो असं होतं ना. होतं असं कधी कधी. प्रसव वेदनाच त्या. त्यांचा त्रास हा होणारच. पण त्या नंतरच्या आनंदाची अनुभूती दिव्य असते ना ? तसंच आहे ते.

संपदा : नविन रचना कशी सुचते ? प्रत्येक वेळी दोघे एकत्रच काम करता की वेगवेगळे सुचलेले असते ?

गाणं हृदयातून येतं... दोघे एकत्रच काम करतो. आम्ही दोघांनी नुसतं एकमेकांकडे बघितलं तरी समजतं की मला काय म्हणायचंय किंवा अजय ला काय म्हणायचंय. कधीतरी वेगळं सुचतंही. पण मग त्यात इगो नसतो. दोघांपैकी जे चांगलं ते आम्ही ठरवतो आणि घेतो.

संपदा : मोठा भाउ म्हणून कधी तु अजय वर दादागिरी करतोस का ?
किंवा अजय लहान भाउ आहे म्हणून तो कधी तुझ्याकडे हट्ट करतो का ?


अतुल : हो असं होतं ना कधी कधी. मी मोठा बनून आलोय आणि मला लहानपणापासून त्याची सवय झालिये. त्यामुळे कुणाला शब्द देताना बोलताना मी त्याला सांगतो की नाही हे असं नाही बोलायचं. आई बाबा नसताना... मी मोठा असल्याने मीच जबाबदार असतो. मग मला तसं वागावं लागतं.

पण म्युझीक बाबतित लहानमोठा असं काही नाही. तिथे आम्ही मिळून काम करतो. मग अजय ने हट्ट केला तरी तो लहान भावाचा हट्ट नसतो तर तो एका क्रिएटर चा हट्ट असतो.

संपदा : अतुल च्या दृष्टीकोनातून अजय ? अजय च्या दृष्टीकोनातून अतुल ? अजय अतुल म्हणजे काय ?

आम्हा दोघांना वेगळं काढता येणारच नाही. बेसिकली लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय. नेहमीच सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहेत. मला जे येतं ते मी करतो. आणि त्याला जे येतं ते तो करतो. म्हणून आम्ही दोघे मिळून पूर्णत्वास जातो.


संपदा : तुमच्या संगीतातून लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो तो कशामुळे ?

लोकसंगीत म्हणजे तिथल्या मातीची ओळख असते. लोकसंगीतच आपल्याला समजतं आणि मनाला भिडतं ! त्यामुळे तो बाज आहे. लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो कारण ते आपल्या रक्तातच खेळलं आहे. हे लोकसंगीत, ही आपली ओळख आम्हाला जगाच्या कानाकोपर्‍यात न्यायची आहे.


संपदा : संगीताचा वारसा तुम्हाला कुणाकडून लाभला आहे ?

नाही. संगीताचा किंवा गाण्याचा तसा काही वारसा लाभला नाही. पण आमच्या आईला गाणी ऐकायला आवडायची आणि वडिलांना बुलबुल सारखी वाद्ये वाजवायला आवडत. त्यापलिकडे काहीच नाही.


संपदा : आयुष्यातला सर्वात संस्मरणीय परफॉर्मन्स कोणता होता ?

झी-मराठीसाठी केलेलं अजय-अतुल लाईव्ह. फार स्वप्न होतं आमचं की आमची अशी एक लाईव्ह कॉन्सर्ट व्हावी. ती ज्याप्रकारे झाली तशीच होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली होती.


संपदा : तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल ?

सारं श्रेय गणपती बाप्पाला. आणि हो देवानंतर अर्थातच आमच्या आई-बाबांना. त्यांचा आमच्यावर अतोनात विश्वास होता आणि आहे.

संपदा : आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल सांगाल का? शालेय शिक्षण् कुठे झालं?

वडीलांची सरकारी नोकरी असल्याकरणाने गावोगावी बदली होत असे. लहानपणी आम्ही शिरूर ला होतो, मग नववी दहावीच्या वर्षी राजगुरूनगरला(खेड) होतो. मग पुण्यात आलो.


संपदा : तुमच्या आवडीनिवडींबद्दल ... संगीता व्यतिरिक्त इतर छंद कोणते आहेत ? त्यासाठी वेळ मिळतो का ?

अतुल : पुस्तकं वाचायला आवडतात, प्रवासात मला पुस्तकांची उत्तम साथ असते. जुने चित्रपट पहायलाही खूप आवडते. मला लहानपणापासून विमानांचं खूप आकर्षण आहे. हे आकर्षण मी कंप्युटर च्या माध्यमातून जपलं आहे. फ्लाईट सिमिलेटर सारखे गेम्स खेळायला मला खूप आवडतात.

अजय : मला म्युझीक शिवाय तसं फारसं विशेष काही आवडत नाही. गाडी चालवता येत नाही त्यामुळे मी तसा बांधलेलाच आहे. वेळ मिळेल तसं वाचन करतो. वॉरीयर्स चे गेम्स खेळतो कधी कधी. मला खाण्याची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणचं चटक मटक ट्राय करायला खूप आवडतं.

संपदा : तुमचे आवडते संगीतकार ?

इलाई राजा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, शंकर जयकिशन, सलील चौधरी, पंचम दा, बप्पी लाहिरी, राम कदम, विश्वनाथ मोरे, राम लक्ष्मण, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर आणि ईंग्लिश मध्ये सॅम्युअल बार्बर, जॉन विल्यम्स, बिथॉन, मोझार्ट, जेरी गोल्ड्स्मिथ.

संपदा : ज्यांच्या सोबत काम करावेसे वाटते पण राहून गेले ते गायक गायिका ?

किशोर कुमार सोबत काम करायचे होते. पण आम्हाला फारच उशिर झाला.
लता दिदींसोबत एक संधी आली होती. पण समहाउ नाही जमून आलं ते.

संपदा : तुमच्या कुटूंबाविषयी थोडं सांगा ?

आम्ही सारे जणू एका धाग्याने बांधले गेलो आहोत. दिसताना जरी अजय अतुल असे दिसत असले तरी आमच्या प्रत्येक कामात घरातल्या सगळ्यांचा सहभाग असतो अगदी आमच्या छोट्या पिल्लांचाही.

संपदा : न आवडलेली.. एखादी गोष्ट अजून चांगली देउ शकलो असतो असं कधी वाटलंय का ?

अतुल : शक्यतो कधी असं झालं नाहिये. त्याचं कारण म्हणजे दोघांचाही स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आपण जे सर्वोत्कृष्ठ तेच लोकांना देउ. अन्लेस् अ‍ॅन्ड अन्टील वी आर सॅटीस्फाईड,

अजय : हं ..कालांतराने असं वाटेलही कदाचीत..अरे आपण हे तेव्हा असं केलं असतं तर अजून छान झालं असतं. पण आता असं काही कधी वाटलं नाही. ओव्हर अ पिरीयड ऑफ टाईम मे बी असं होइल कदाचित की अमूक एका इन्स्ट्रउमेंट पेक्षा वेगळं काही उपलब्ध असेल आणि त्या पेक्षा ते जास्त सरस ठरेल.

संपदा : संगीतकार झाला नसता तर ? पुढल्या जन्मी कोण व्हायला आवडेल ?

अतुल : संगीतकारच झालो असतो. पुढच्या जन्मीचा मी विचार नाही केला.

अजय : ह्या जन्मी मी जो आहे तोच झालो असतो. म्युझीक शिवाय दुसरा काही विचारच मी कधी केला नाही. पण पुढच्या जन्मीचे म्हणाशिल तर एक रितसर संगीतकलेचे धडे घेतलेला संगीतकार बनायला मला जास्त आवडेल.

संपदा : तुमची काम करण्याची काही खास वेळ आहे का ? काही जणांना रात्री किंवा पहाटे काम करायला आवडतं ..

आम्हा दोघांचीही अशी काही वेळ नक्की नाहिये. संगीत सततच आमच्या बरोबर असतं. कधी एखादं गाणं गाडी चालवतानाही सुचतं. उर्मीच ती केव्हाही येते.

संपदा : इतर भाषांमध्ये काम करतानाचे काही अनुभव सांगाल का ? गाणं बांधलं जातं चाल बसते.. पण त्या शब्दांत भाव खरंच उतरले आहेत हे कसं समजतं?

एखादं गाणं करायचं म्हणजे त्या गाण्याची सिच्युएशन कोणती आहे त्याला साजेश्या भावना आमच्या संगीतातून उतरवायचा प्रयत्न आम्ही करतो. बेसिकली संगिताला भाषा अशी नसतेच. ते ऐकून काळजाला हात घातला जातोच जातो मग ती कुठलीही भाषा असूदे तमिळ तेलुगु हिंदी मराठी नाहीतर इंग्लिश.

संपदा : तेलुगु गाणं करताना काही प्रॉब्लेम होते का ?

अजय : तेलुगु मध्ये काम करताना तशी काही अडचण आली नाही. राजा सरांचे थोडेफार संस्कार होते आमच्यावर. आणि साउथ च्या लोकांची साधारण आवड पक्की माहित होती. त्यामुळे कदाचीत राम गोपाल वर्मांना आम्ही ते करावं असं वाटलं.

लिरिकली म्हणशिल ९५ टक्के कंपोसिशन आम्ही आधी केलेली होती. जेव्हा ती चाल म्हणून एकदा आमच्याकडून अप्रूव्ह झाली मगच त्यावर शब्द लिहून घेतले गेले. त्यांनी आम्हाला तो फ्रीडम दिला होता. नाहीतर आधी लिरिक्स लिहून साउथ चं प्रोजेक्ट शक्य नव्हतं.

संपदा : इलाईराजाबद्दल काय सांगाल ?

अजय : इलाईराजा म्हणजे आमच्यासाठी द्रोणाचार्य आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यम मुळे त्यांची भेट घडली. आपल्या दैवता समोर बसून त्यांच्याशी आपल्याला बोलता यावं याहून अधिक काय ना? तो आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे. कधीही न विसरता येण्यासारखा.

इलाईराजा ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत म्हणजे फक्त नृत्य करायला लावणारं असं नाही तर ती अशी एक दैवी देणगी आहे की ती आपल्या मनाला डोलवायला लावते. हे समजलं ते इलाईराजा मुळे. संगीताकडे बघण्याचा अंतर्बाह्य दृष्टीकोन बदलला तो त्यांच्याचमुळे.

संपदा : शाळा/ कॉलेजमधले काही गमतीशीर किस्से सर्वांसोबत शेअर कराल ?

अतुल : मी स्वत:च्या अभ्यासाबद्द्ल कधीच विचार केला नाही. मला नेहमी वाटायचे भूगोलात खारे वारे मतलई वारे शिकून काय करायचय ? तसंच गणित म्हणजे माझा त्याचा छत्तिसाचा आकडा. मग काय दहावीच्या प्रिलीम ला गणिताच्या पेपरमध्ये चित्र काढली होती. जाम ओरडा खाल्ला होता आईचा.

अजय : मी शाळेच्या घोष पथकात ड्रम वाजवत असे. एकदा स्पर्धा होत्या मी काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात भलतीच काहीतरी मनाची रचना वाजवली. परिक्षकांना माझी ती रचना आणि माझा आत्मविश्वास खूप आवडला असावा. कारण मला पहिलं बक्षिस मिळालं होतं.

अजून एक किस्सा सांगतो.

मी राजगुरुनगर ला शाळेत असताना आम्ही चार पाच जण माईकवरून सकाळी साडेसातची प्रार्थना म्हणायचो. आणि मला बरेचदा शाळेत यायला उशीर व्हायचा. माझ्या घरापासून शाळेपर्यंत् जाताना अजुन एक शाळा होती. आणि नेमकं मी तिथून जात असताना त्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होत असे. मग अगदी सावधान मध्ये उभं राहणं आपलं आद्य कर्तव्य, आणि त्यातुनही मी एन. सी. सी. कॅडेट, राष्ट्रगीताचा मान राखायलाच हवा ना ?

मला दोन चार वेळा असं शाळेबाहेर राष्ट्रगीतासाठी उभं बघून एकदा त्या शाळेच्या शिक्षकांनी आत बोलावून माझं अगदी कौतूक केलं. पण नंतर तिथून मी माझ्या शाळेत पोहोचेपर्यंत चार पाच मिनिटे लागली आणि शाळेत जाउन अंगठे धरायची शिक्षा मिळाली. मग दुसर्‍या शाळेत झालेले कौतूक काय आणि कसे सांगणार सरांना ? गपचूप शिक्षेला उभा राहिलो.


संपदा : इतरांना संगीत शिकवता का ? शिकवायला आवडेल का ?

नाही. शिकवत नाही. कारण आम्ही कुठे काही शिकलो नाहिये.

आता शिकण्या शिकवण्याचा विषय निघालाच आहे तर आम्हाला काय वाटतं, की हल्ली पालकांना काय वाटतं आपण आपल्या मुलांना गाण्याच्या- तबला-हार्मोनियम च्या क्लास ला घातलं म्हणजे झालं. पण ते सोडूनही संगीत आहेच की. बाकिची इतकी सुंदर सुंदर वाद्ये आहेत. ति काय फक्त बँडवाल्यांचीच का? शक्य असतिल ती सगळी वाद्ये द्या ना मुलांना. खेळू द्या त्यांना.. त्याच्यातूनच त्यांच्या अवती भवती संगीत खर्‍या अर्थाने निर्माण होइल.

सध्या आम्ही शिकवत नाही आहोत. पण आमचा त्या दॄष्टीने प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्या संदर्भात काहितरी नविन घेउन आम्ही लोकांसमोर येउ.


संपदा : ह्या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल ?

खूपदा गायक विशिष्ठ एका गायन शैलीत अडकून रहातात, संगीतकारही कित्येकदा एकाच प्रकारच्या चाली किंवा संगीतात काम करत रहातात. गायकाने किंवा संगीतकाराने गाण्यातल्या सर्व भावना, भाव समजावून गाणं गायलं पाहिजे किंवा संगीत दिलं पाहिजे. गाण्याच्या इमोशन्स प्रमाणे बाज वापरला गेला पाहिजे. तरच तुम्ही हरहुन्नरी बनाल.

संगीत हे इन्स्टॉल्मेन्ट मध्ये शिकता येत नाही, पार्ट टाईम तुम्ही म्युझिक करु शकत नाही. किंवा तुम्ही संगीतात एखादी डीग्री घेउन तुम्हाला संगीत सर्वसाध्य, सहजशक्य होईलच असे नाही.

जो पर्यन्त गाणं किंवा संगीत तुमच्या हृदयातून येत नाही, तुमच्या स्वतःच्या मनाला भिडत नाही, तो पर्यंत ऐकणार्‍याचा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणार्‍या रचना तुम्ही देउच शकणार नाही.

संपदा : फ्युचर प्लान्स ? अजय्-अतुल हे नाव भविष्यात कुठे असावं असं वाटतं ?

अतुल : फ्युचर प्लान्स बद्दल भरपूर गोष्टी आहेत पण त्या बद्दल सध्या काही बोलणार नाही. तुमचं कामच सगळं बोलतं. हजार गोष्टी करण्यापेक्षा मोजक्याच गोष्टी करू की त्या त्या क्षेत्रातल्या माईलस्टोन ठराव्यात. पाचशे चित्रपटांना संगीत देउन लोकांनी त्यातले फक्त पन्नासच लक्षात ठेवावे त्या पेक्षा भले आम्ही पन्नास चित्रपट करू. पण त्यातला प्रत्येक चित्रपट लोकांना संस्मरणीय असेल. प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करून एखाद्या गोष्टीचा 'ट्रेंड' हा आमच्या पासून सुरु व्हावा.

अजय : त्याच्याकडे आमच्यासाठी प्लान आहे. 'गॉड हॅज अ प्लान फॉर अस !' वी आर जस्ट फॉलॉविंग दॅट प्लान. जास्त काही सांगत नाही. पण विश्वविनायक-२ करायचा विचार आहे.


संपदा : मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल ?

जगभरात विखुरलेल्या मायबोलीकरांचे योगदान खरंच वाखाणण्याजोगे आहे. इंटरनेट्चा इतका प्रभावी पणे वापर करून ऑनलाईन गणेशोत्सव, दिवाळी ह्यासारखे सण साजरे करुन आपल्या संस्कृतीचे जतन करित आहात. मायभूमीपासून हजारो मैल दूरवर राहूनही आपल्या पुढ्च्या पिढीला समृद्ध करीत आहात. देशाविदेशातल्या देशबांधवांना एकत्र आणण्याचे मायबोलीकरांचे हे काम अव्याहत पणे असेच चालू रहावे हिच सदिच्छा. तसेच आम्हा दोघांतर्फे सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा !

10/15/2009

चकली (मूगडाळीच्या चकल्या)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे 
 
लागणारे जिन्नस: 
मूगडाळ १ वाटी
मैदा ३ वाट्या
पांढरे तिळ, ओवा, जिरं आवडी प्रमाणे
लाल मिर्ची पावडर, मिठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
 
क्रमवार पाककृती: 
कुकरच्या एका डब्यात मूगडाळ साधारण वरणाला पाणि घालतो तितके पाणि घालून लावावी.
व कुकरच्या दुसर्‍या डब्यात ३ वाट्या मैदा (सुका) अजिबात पाणि न घालता घट्ट झाकण लाउन ठेवावा. (तलम मलमलच्या कापडात पुरचुंडी बांधून मैदा ठेवला तरी चालतो.)
नेहमीप्रमाणे वरणभाताचा कुकर लावतो तेव्ढ्या वेळ कुकर ठेवावा.
कुकर थंड झाल्यावर मूगडाळ घोटून घ्यावी.

मैदा चाळून घ्यावा. म्हणजे वाफेने गुठळ्या झाल्या असल्यास निघून जातात आणि हलका होतो.
मैद्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा, पांढरे तिळ, आवडत असल्यास खरबरित वाटलेले जिरे टाकावे व दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून नंतर मुगाच्या शिजवलेले वरण टाकून पिठ घट्ट्सर भिजवून घ्यावे.
सोर्‍याला तेलाचा हात लाऊन पिठ भरून साधारण दोन किंवा तिन वेढ्यांच्या एकसारख्या चकल्या कराव्या व तळाव्यात.

chakli.jpg
 
अधिक टिपा: 
 
  • चकली तळताना तेल चांगले तापवून मग मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
  • एक्दम प्रखर आचेवर चकल्या तळल्याने त्या लवकर तळल्या जाउन नंतर थंड झाल्यावर मउ पडतात.
  • पिठात तेलाचे मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात तळताना हसतात. विरघळतात.स्मित
  • पिठ भिजवताना हळद वापरू नये. चकली तळल्यावर काळी दिसते.

10/12/2009

मडिकेरी-कूर्ग

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

मडिकेरी म्हणजे कूर्ग चे जिल्हा हेडक्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ५००० फूट ( साधारण १५२५ मिटर्स) उंचीवर असलेला हा प्रदेश. उतरणीच्या टेकड्यांवर वसलेलं एक छोट्टसं गाव. बुटक्या बैठ्या लाल कौलारु बंगल्यांची शोभा काही निराळीच. इथे रहाणारे कोडवू लोक हिंदू क्षत्रिय व खूप शूर. हे मडिकेरी किंवा मर्केरी १६८१ मध्ये हलेरी चा राजा मुद्दु ह्याने वसवलं. म्हणूनच त्याला मुद्दुराजकेरी आणि नंतर अपभ्रंशित मर्केरी किंवा आत्ताचं प्रचलित नाव मडिकेरी मिळालं असावं.

इथल्या संस्कृती बद्दल समजावून घेताना कळलं की, कोडवू हा शब्द मुळच्या कुडू ह्या शब्दापासून आला आहे. कोडाईमालेनाडू म्हणजे टेकड्यांचा प्रदेश -"dense forest on steep hills". दक्षिण भारतातल्या नयनरम्य निसर्ग सौन्दर्य लाभलेल्या हिलस्टेशन्स पैकी एक असलेले कोडवू म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान आहे. कोडवू लोक कावेरीची पूजा करून स्वतः ला तिची लेकरे मानतात. आदरातिथ्य करण्यात कोडवू लोक सर्वश्रुत आहेत. कोडवू रेसिपिज सुद्धा तेवढ्याच छान आहेत.
पूर्वापार चालत आलेल्या इतीहासापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या शीलालेखांवरून असे समजते की कूर्ग वर कुण्या एकाच राजघराण्याची सत्ता नव्हती. तर अनेक राजांनी वेगवेगळ्या काळात इथे राज्य केले होते. इथे असणार्‍या शीलालेख आणि ताम्रपटांवर इथे गंगा, कदंब, छोला, कोंगवा, होयसाला आणि नायक ई. वेगवेगळ्या लोकांनी राज्य केल्याच्या नोंदी आहेत. हा झाला मडिकेरीचा इतीहास.

कूर्ग कर्नाटकाच्या पश्चीमी घाटावर सुमारे ४१०२ स्के. मी ईतकं वसलेलं दर्‍या खोर्‍यांचं गाव आहे. बंगळूर ते मडिकेरी अंतर २५२ किलोमिटर आहे. चहा कॉफीच्या बागा मळे पहायच्या तर कूर्गला जावे. मऊ धुक्याने भरलेली दरी पहायला, नगमोड्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घ्यायला कूर्गला जावे. खरं तर ऑक्ट्बर ते मे हा इथला मेन सिझन. पण पावसा आधी पावसा नंतर केव्हाही जाण्यात आनंदाची पर्वणीच आहे.

आम्ही सकाळी सहा ला मडिकेरिला जाण्यासाठी बंगळूरहून निघालो. SH-17 वरून श्रीरंगपट्टना, व्हाया मड्डूर बायपास, रंगनथिट्टु, हुंसूर असे करत मग SH-88 मार्गे कुशलनगर वरून मडिकेरीला जावे लागते. साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कुशलनगर पार करून सुन्तिकोप्पल सोडलं पुढे मडिकेरीकडे जवळच आहे असं समजलं. रस्ता फारच छान होता. जसजशी वळणे वाढत गेली त्याचबरोबर हिरवाईही. रस्त्यात भरपूर बांबूची वनं आहेत. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार बागांमध्ये कसलीशी टप्पोरी फुलं फांदीभर लगडलेली दिसू लागली. त्या फुलांचा वास आसमंतात भरून राहिला होता. गाडी पुढे जाउ लागली तशी ह्या झाडांची शेतीच आहे.. मळे फुललेले दिसले आणि आम्ही खात्री केली हेच ते कॉफीचे मळे. उतरणीच्या रत्यांवर लाल कौलारू घरं दिसू लागली. अमुक तमुक कॉफी इस्टेट.. होम स्टे असे बोर्ड दिसू लागले. इथले लोकल लोक खास घरं ट्युरिस्ट लोकांना होम स्टे देतात. तिथल्या रहाण्याबद्द्ल आणि जेवणाबद्द्ल एक दोन स्नेह्यांकडून बरेच ऐकले होते. आम्ही क्लब महिन्द्रा रिसॉर्ट ला जाणार असल्याने ते शोधत खुद्द मडिकेरीमध्ये पोहोचलो. एका चौका सारख्या ठिकाणी ट्युरिस्ट इन्फॉर्मेशन साठी मोठठा बोर्ड दिसला. काही लोकल साईट सिईंग पॉईंट्स आहेत. सगळे जवळ जवळ होते. रिसॉर्ट् वर जाउन फ्रेश होउन, जेउन निघालो साईट सिईंग ला.

मडिकेरी किल्ला : (Madikeri Fort)आधी मातिच्या असलेल्या ह्या किल्यांची टिपू सुलतानाने सध्या असलेल्या दगडी किल्ल्यात पुनःबांधणी केली. अठराव्या शतकात टिपू सुलतानाने इथे राज्य केले होते. किल्ल्याच्या आत साधे बांधकाम असलेला लिंगायत राज्यकर्त्यांचा राजवाडा आहे. ह्या किल्ल्यावरून पूर्ण मडिकेरी भागाचे उत्तम दर्शन होते.

गदिग्गे : (Raja's Tomb)
ह्या ठिकाणी राजा लिंगराजेन्द्र ह्यांची सन १८२० मध्ये बांधलेली समाधी आहे. तसेच त्या बरोबर राजाचे धर्मगुरु आणि मोट्ठा विरराजेंद्र आणि राज्याच्या दोन सैनिकांच्याही समाधी आहेत इथे. मडिकेरी शहरातल्या महादेव पेठेच्या उत्तरेकडे ही गद्दिगे आहे.

ओंकारेश्वर मंदीर : (Omkareshwara Temple)


कोडवू राजा लिंगराज याने सन. १८२० मध्ये बांधलेले थोडेसे मुघलाई धाटणीचे हे शंकराचे मंदीर आहे. मध्यभागी मोठा मशिदीसारखा घुमट आणि त्या बाजुला चार छोटे मिनार आहेत.

मुख्य मंदिराच्या गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा करायला मोठ्ठा परिसर आहे. काही खोल्यांची तटबंदी आहे. त्याच्या भंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे पहायला मिळतात. मंदिर परिसरात एक अतिप्राचिन विहीर आहे.

मंदिरासमोरच एक छोटासा तलाव आहे.


ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते. लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले. तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला. मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली. असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे.

अ‍ॅबी फॉल्स : (Abbey Falls)

बोली भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. मडिकेरीपासून साधारण १-२ किमी आत एका खाजगी कॉफी ईस्टेटीत हा नयनरम्य धबधबा आहे. ह्या भागात पर्यटकांची बरीच गर्दी असते. इथे आल्यावर बाहेर बर्‍याच खाउच्या कणसं नारळपाणी उसाचा रस विकणार्‍या गाड्या दिसल्या. गाडी पार्क करून आत खाली बरंच चालत गेल्यावर हा धबधबा आहे. कावेरीचे पाणी उंच खडकांवरून पडताना फारच सुंदर दिसते. धबधब्याचा चांगला व्ह्यु मिळावा म्हणून एक झुलता पूल बांधलेला आहे.


अ‍ॅबे फॉल्सहुन परत येइ तोपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. राजाज सिट ला जाउन सनसेट बघायचा होता.

राजाज सिट :(Raja's Seat)
फोर्ट पासून एक किलोमिटर अंतरावर हा पॉईंट आहे. कोडवु राजे इथे बसून सुर्यास्त बघत. एक छोटीशी बाग आहे. आणि बच्चेकंपनीला खेळवायला फिरून आणायला छोटीशी ट्रेन आहे इथे. बागेच्याच पश्चीमेकडे एका उतरत्या टेकडीच्या पाहिर्‍यांवरून मडिकेरी भोवतालच्या निसर्गाचे एकाच ठिकाणाहून दर्शन होते. न मावळणारा सूर्य, हिरवे हिरवे गालिचे पसरलेले चहा कॉफीचे मळे, आणि हिरवाईवर पांघरलेले चंदेरी ढगांच्या दुलईसारखे भासणारे आकाश. मावळतिच्या त्या लालभडक मोठ्या सुर्यबिंबाचे दर्शन घेउन मन अगदी तृप्त झाले.

खुद्द मडिकेरीमध्ये पहाण्यासारखे इतकेच होते. मग दुसर्‍यादिवशी जवळपास फिरून यायचे ठरले.
सकाळी नाष्ता करून भगमंडला नावाचा नदिचा संगम आणि तलकावेरी म्हणजे कावेरीचे उगमस्थान पहाण्यासाठी निघालो.

भगमंडला : (Bhagamandala)

मडिकेरी पासून ३३ किलोमिटर वर हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी कावेरी आणि कनिका ह्या दोन नद्यांचा संगम आहे. तिसरी सुज्योती नावाची नदीही ह्या संगमाला जमिनीअंतर्गत मिळते. १७ किंवा १८ ऑक्टोबर ला जेव्हा तुला संक्रमण असते तेव्हा अनेक यात्रेकरू ह्या संगमात स्नान करून पुण्य मिळवतात. ह्या संगमाजवळच भगंडेश्वराचं मंदिर आहे. केरळी पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिरात शंकर, सुब्रमण्या, महाविष्णू आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

हा भगमंडला नावाचा भाग सन १७८५ ते सन १७९० या काळात टिपू सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ह्या भागाला अफिसालाबाद असे म्हणले जायचे. मग १७९० ला राजा विरराजेन्द्राने तो पुन्हा कोडागू म्हणून स्वतंत्र मिळवला.

तलाकावेरी : (Talakaveri) कावेरी नदीचे उगमस्थान
ब्रह्मगिरी पर्वताच्या पुर्वेकडील उतारावर, भगमंडलापासून सुमारे ८ किलोमिटर अंतरावर कावेरी नदिचे उगमस्थान आहे.
ज्या ठिकाणी नदिचा प्रवाह उगम पावतो त्याला गुंदिगे असं म्हणतात. त्याला लागूनच एक छोटसं पाण्याचं कुंड (तलाव) आहे. ह्या कुंडाचे पाणी पुढे जमिनीत अंतर्धान पावतं ते दूरवर साधारण एक दिड किलोमिटर खोल टेकडीवर पुन्हा आढळतं. दर वर्षी तुलासंक्रांतिला ह्या गुंदिगे ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढ्तो त्याला तिर्थोद्धवा असं म्हणतात. हे तिर्थ म्हणजे साक्षात पार्वती इथे अवतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक हे पवित्र तिर्थ भरुन आपल्या घरी घेउन जातात.

ह्या गुंदिके जवळच दोन छोटीशी मंडिरं आहेत. एक गणेशाचं आणि दुसरं शिवाचं. असं सांगण्यात येतं की इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाजवळ अगस्त्य ऋषींना त्रिमुर्ती-ब्रह्मा विष्णू महेषाचा साक्षात्कार झाला होता. तसेच ह्या ठिकाणी सप्तमहाऋषींनी मोठे यज्ञ केल्याचंही सांगितलं जातं.

ह्या तलाकावेरीपासूनच वर ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी पाहिर्‍या आहेत.
आम्हीही थोड्या पाहिर्‍या चढून उतरून आलो. दमून संध्याकाळी उशिरा रिसॉर्टवर पोहोचलो. क्लब महिन्द्राच्या कॉटेजेस मस्त आहेत. सगळी व्यवस्थाही चोख आहे. जेवणासाठीही बरेच ऑप्शन्स उपलब्ध होते. तरिही आम्ही मडिकेरी मधे अजुन दोन तिन हॉटेल्स खादाडीसाठी शोधून ठेवली होती.

पुन्हा बंगळूर ला परताना परतीच्या वाटेवर कुशलनगर जवळ बरीच ठिकाणे आहेत. पिकनिक स्पॉट्स आहेत. ट्रेकिंग करणार्‍या हौशी लोकांसाठी छोटे छोटे अ‍ॅडव्हेंचर कॅंप्स आहेत.

वीरभूमी :

कर्नाटकातलं एकमेव थीम रेसॉर्ट आणि अ‍ॅडव्हेंचर कॅंप.

निसर्गधाम :

मडिकेरीपासून ३० किमी. आणि कुशलनगरपासून फक्त २ किमी अंतरावर हे रेसॉर्ट आहे. नावाप्रमाणेच निसर्गधाम आहे. इथे हरीणं, हत्ती, मोर आणि इतर बरेच प्राणि बघायला मिळतात. इथे इलेफंट सफारी असते. एक मस्त अविस्मरणीय सफर.

गोल्डन टेंपल : (GoldenTemple- Buddhist Monastery)

कुशलनगर पासून ४ किमी वर बायलाकुप्पे नावाच्या ठिकाणी तिबेटीयन लोकांचा रिफ्युजी कँप आहे. चिन ने तिबेटचा ताबा मिळवल्यावर, बरेचसे रेफ्युजी ह्या कुशलनगरजवळच्या बायलाकुप्पे ला स्थाईक झाले.
१९७२ ला ही बुद्धीस्ट मोनस्ट्री पुनःप्रस्थापीत केली.

बायलाकुप्पेला आल्यावर सर्वत्र पिवळे झेंडे फडकताना दिसतात. स्तूप दिसतात. मग आपण गोल्डन टेंपल जवळ येउन पोहोचतो. गोल्डन टेंपल फारच प्रेक्षणिय आहे. मुख्य गेट पासूनच रांगोळ्यांसारखी रस्त्यावर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.

मुख्य मंदिराच्या दालनात आतमध्ये ४० फुटी मोठ्या पद्मसंभव, बुद्ध आणि अमितयुस यांच्या मूर्ती आहेत.


दुबेर : (Dubare)

कुशलनगर जवळच मडिकेरी सिद्धपूर रोडवर कावेरी नदीतीरावर कूर्ग वनविभागाचा दुबेर एलिफंट ट्रेनिंग कँप आहे. इथे जंगली हत्तींना पकडून त्याना इतर प्रशिक्षीत हत्ती आणि स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी कावेरीचा प्रवाह छोट्या बोटीतून पार करावा लागतो.

आणखी पुढे परतीच्या वाटेवर हुंसूर वरून नागरहोल अभयारण्याकडे एक फाटा आहे. पण वेळे अभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही. मग नागरहोल आणि बंदिपूर ही अभयारण्ये पुन्हा एखाद्या मोठ्ठ्या विकेंड ला येउन बघायचे ठरवून आम्ही घरी परतलो.

10/06/2009

लंकेची पार्वती

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्‍याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.

कैलासावर रहाणार्‍या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्‍या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्‍याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्‍याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !

9/20/2009

ये कौन चित्रकार है ?


परवा  लेकाचं कपाट आवरताना एका ड्रोवर मध्ये खूपश्या कागदांचा पसारा मिळाला. रद्दी आवरून टाकुया म्हणत सहजच पेपर चाळत गेले. आणि काय आश्चर्य इतका मोट्ठा खजिनाच हाती लागला. माझ्या साडेतीन वर्षांच्या लेकाची ही चित्रं इथे तुमच्यासोबत शेअर करतेय. ही सगळी चित्रे म्हणजे त्याचा कल्पना विलास आहे. कुठल्याही पुस्तकात वगैरे पाहून काढली नाहियेत. किंवा कुणी शिकवली पण नाहीये.  गोष्टी ऐकून त्याने मनाने काढली आहेत. तिही काही क्षणांत.

कैलास पर्वतावर काढलेले गणेशाचे फॅमीली  पिक्चर आहे म्हणे.

निट बारकाईने बघितल्यावर कळतंय…. डाव्या बाजूला त्रिशूळ उभा केलाय. मागे कैलासावरच्या हिमनगांच्या रांगा :)  मध्यभागी  बालगणेश आपल्या आईबाबांच्या मध्ये बसलाय. आणि कार्तिकेय खेळतोय बाजूला. बाप्पांनी उंदिर समोर पार्क केलाय आणि नंदी आणि कार्तिकेयाचं वाहन मोर उजवीकडे आहेत. सगळे पार्किंग लॉटमध्ये…


हे काय तर म्हणे गणपती बाप्पा आणि शंकरबाप्पा कैलासावर आहेत तिथल्या थंडीच्या वार्याने शंकरांचे केस असे उडताहेत : D

हा बजरंगबली 

हा म्हणे इझी  गणेशा  




विष्णू आणि शेषनाग 





गणपती बाप्पा माखनचोर झालाय ;)



गणपती सरस्वती सोबत.


बाप्पा पडले..मोदक सांडले चंद्र हसला..

हीच ती कथा गणपती उंदरावरून पडला चांदोबा हसला आणि चांदोबाला शाप मिळाला. मला कल्पनाशक्तीची कमाल वाटली इथे लेकाची. तुम्ही तो उंदराच्या बाजूला असलेला नाग पाहिलात का ?





हा गोपालकृष्ण मागे हाड्कुळा पेंद्या खेळतोय. :)



हे शिवाजी महाराज त्यांच्या घोडया सोबत आणि मागे मावळा

4/03/2009

स्वीस रोल




लागणारा वेळ:

२० मिनिटे

लागणारे जिन्नस:

मारी बिस्किटे २०० ग्रॅम
ड्रिंकिंग चॉकलेट १००ग्रॅम
पिठीसाखर ४०० ग्रॅम
डेसिकेटेड खोबरे १०० ग्रॅम
लोणी ३० ग्रॅम

क्रमवार पाककृती:

  1. मारी बिस्किटांचा मिक्सर मध्ये चुरा करुन घ्या व बारीक चाळणीने चाळुन घ्यावा.
  2. बिस्कीटाच्या चुर्‍यात ड्रिंकिंग चॉकलेट, अर्धी पिठीसाखर व लागेल तसे दुध घालून कणकेसारखे मळुन गोळा करुन ठेवा.
  3. पोळपाट व लाटण्याला तुपाचा हात लावुन गोळा पोळीसारखा लाटुन घ्यावा.
  4. लोणी, उरलेली पिठी साखर व डेसिकेटेड खोबरे एकत्र करुन तयार करुन त्या लाटलेल्या पोळीवर सर्वत्र एकसारखे लावावे.
  5. मग पोळीचा रोल करुन फ्रीज़ मधे गार करण्यास ठेवावे.
  6. १ तासाने बाहेर काढुन हव्या त्या मापाच्या जाडसर वड्या कापाव्यात. झटपट स्विस रोल तय्यार.

वाढणी/प्रमाण:

खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)

अधिक टिपा:

लहान मुलांसाठी बनवताना आणखी लहान आकाराचे बनवता येईल.
बच्चा पार्टी असेल किंवा अचानक कुणी येणार असेल तर झटपट करता येण्यासारख्या आहेत.

3/10/2009

लांबनाक्या :८)

 योगायोगाने मला ह्या लांबनाक्या भाज्या दिसल्या. मजेशीर दिसल्या म्हणून सहजच फोटो टाकतेय. 
थोडी गंमत.. ह्या वांग्याला नाक डोळे काढले आहेत.

  

हा एक ढब्बुशेठ टोमाटो लांबनाके 

ही मिर्ची लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांत  चंद्र असाच असतो ना ? 





2/19/2009

शिवखोड़ी

कित्येक दिवसांपासून एकदा वैष्णोदेवी -कश्मिर करायचं मनात होतं. गेल्या डिसेंबरला योग आला. वैष्णोदेवी कट्रा बरेच जणांना माहित आहेच आणि दर वर्षी वेगळ्या वेगळ्या ऋतुंमध्ये भाविक त्रिकूट पर्वतावर जाऊन वैष्णोदेविचे दर्शन घेतात. परंतू कट्राजवळच एक शिवखोडी नामक श्रद्धास्थान सुद्धा आहे. ह्या शिवखोडी ची महिमा अपरंपार आहे. फार कमी लोकांना ह्याबद्द्ल माहित असेल. पण जो कुणी एकदातरी ह्या शिवखोडीला जाउन दर्शन करून येतो तो फार भाग्यवान म्हणला जातो. ह्या दर्शनाचा आणि शिवखोड़ीचा जो काही एक दोन तासांचा प्रवास आहे तो माझ्या मनःपटलावर अजूनही जसाच्या तसा तरळत आहे. आता तुम्ही म्हणाल हे शिवखोड़ी आहे तरी काय ? शिव नावाचा संदर्भ तसा तुम्ही सुजाण वाचकांनी लावलाही असेल. अगदी बरोबर... शंकर बाप्पा..

अगदी अजाणत्या वयापसून शंकड बप्पा माझा खुप आवडीचा देव. का तर त्याची सगळीच मंदिरं खूप छान असतात. छान म्हणजे वेगळी..मोठ्ठी..शांत.. निर्जन स्थळी..नदी किनारी...समुद्रकिनारी..सगळ्याच शंकराच्या मंदिरात निरव शांतता आणी मन प्रसन्न करणारी काहीतरी जादूई शक्ती असते.मग ते गावातलं सिद्धेश्वर मंदीर असो.. नदीपल्याडचं केदारेश्वर असो.. की समुद्रतीरावरचं कुणकेश्वर असो..पुन्हा पुन्हा तिथे जाण्याचा मोह होतोच नक्की. प्रत्येक मंदिराची कथा निराळी आणि अद्भूत.. त्यांच्या अद्भूत विरागी स्वामी सारखी.

शिवखोड़ी ची कथाही तशीच.अशी कथा आहे की एकदा बाबा औघड़दानी आशुतोष भगवान शिवजी कैलास पर्वतावर समाधीत लीन होते. काही वेळाने जेव्हा शिवजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी भस्मासूराला तप:श्चर्या करताना पाहिलं. त्याच्या कठिण तपस्येवर प्रसन्न होउन भगवान शंकरांनी त्या असूर श्रेष्ठाला आपल्या इच्छेनुसार वरदान मागावयास सांगितले. तेव्हा त्या असुराने शंकराला म्हटले "हे भगवन मी ज्याच्या मस्तकावर माझा हात ठेवीन तो भस्म होईल असा मला वर द्या " भगवन भोळे सांब "तथास्तू !" म्हणाले. परंतू वर मिळाल्यावर भस्मासूर सर्वशक्तीमान झाला. तिन्ही लोकाचा स्वामी बनायची त्याची इच्छा झाली.

पुढे नंतर एकदा कैलास पर्वतावर जाताना एके ठिकाणी शिव पार्वती विश्राम करित होते. तेव्हा त्या ठिकाणी भस्मासूर आला आणी त्यांच्याशी युध्द करू लागला. ज्या ठिकाणी युद्ध झाले ते स्थान म्हणजे 'रंशू' (रण+सू) नावाने विख्यात आहे. रण म्हणजे युद्ध आणि सू म्हणजे स्थान. भगवान शंकरानी आपल्या वरदानाच्या मर्यादा राखण्यासाठी तिथून जाण्याचे ठरवले. त्यांनी आपले त्रिशूळ फेकले आणि त्या पाठोपाठ पार्वतिला घेउन नंदिवर स्वार होउन ते त्रिशुळाच्या मागे मागे निघाले. ते त्रिशूळ एका पहाडात जाउन तिथे एक विशाल गुहा तयार झाली. भोलेनाथ मग देवी पार्वतिला घेउन गुहेत निघून गेले. त्यांनी आपल्या मायावी शक्तीने गुहेचे द्वार बंद करून घेतले. भस्मासूराने आत जाण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला प्रवेश करता आला नाही मग आत गुहेमध्ये शंकर समाधीस्त झाले. ह्याच स्थानाला शिवखोडी म्हणतात.

शिवखोड़ी म्हणजे शिव गुंफा. इथे निसर्गाने अजब जादू केलिये ति विसरणे शक्य नाही. उधमपूर जिल्ह्यात रंशू गावाजवळ असलेल्या शिवखोड़ीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक म्हणजे कट्रावरून साधारण ८० कि.मी किंवा दुसरा थेट जम्मुहून ११० कि.मी. व्हाया अखनूर. आम्ही कट्राला मुक्कामी होतो म्हणून मग वैष्णोदेवीचे दर्शन करून दुसर्‍या दिवशी सकाळी शिवखोड़ी ला गेलो. टू बाय टू च्या बसेस कट्राला सकाळ पासून उभ्या असतात. चलो शिवखोड़ी शिवखोड़ी असं ओरडत ड्राईव्हर आणी त्यांचे हेल्पर्स बस भरून भरून घेउन जातात. आम्ही गेलो तेव्हा रस्त्याचे काम सुरू होते.. आमची टू बाय टू बस त्यात असा दगड धोंड्यांचा रस्ता..पोहोचेपर्यंत हाडं खिळखिळी होणार ह्याची आम्ही मनाशी खुणगाठ पक्की केली. त्यात भरीला ड्राईव्हरने त्याच्या करमणूकीसाठी काहितरी अशक्य कर्कश्य चिरक्या आवाजात गाणी लावली. गाणी हिंदी होती ह्या पलिकडे मला काहीही समजले नाही. वळणा वळणाच्या रस्त्याने बस धावत होती. कट्रामार्गे रस्त्यात बरिचशी प्रेक्षणिय स्थळे आहेत परतिच्या प्रवासात आपण ती करू असे कंडक्टर ने सांगितले।


वाट वळणाची....जीवाला या ओढी


चिनाब नदीवरचा पूल ओलांडून आम्ही सरळ रंशू गाठलं बस थांबली.. आणि इथून पुढे तिन साडेतिन किलोमिटर पायी चालावं लागणार होतं. घोडे आणी पालखीची सोय आहे तिथे. स्थानिक लोकांच्या उपजिविकेचे साधन. छोटा श्रेयान सोबत असल्यामुळे आम्ही घोडे करायचं ठरवलं. जसजसे पुढे जाउ लागलो तसे उन तर दिसेनासे झालेच्..पण थंडीही भरपूर वाढली सुर्य असतानाही.. रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचच उंच हिरव्यागार डोंगराने सारं उन अडवलं होतं.. डोंगरावरच्या त्या गर्द हिरव्या रंगाच्या छटांमधून तो उनसावलीचा खेळ जितका रम्य वाटतो तितकाच तो मला नेहमीच अगम्यही वाटतो.

त्या अति उंच डोंगरावरून पुढे वर वर जाणारी ठिपक्यांएवढी माणसं शेळ्या मेंढ्या आणी एक दोन घोडे दिसले म्हणून सोबत असलेल्या घोडेवाल्याला मी विचारलं "हे इतके वर कुठे चालले आहेत ? " आपलं डोगरी भाषेतलं गाणं माझ्या प्रश्णामुळे त्याने थांबवल आणि सांगितलं की हे भटके गुर्जर लोक आहेत.. श्रीनगर ला जेव्हा बर्फ पडतं तेव्हा तिकडची घरं सोडून हे लोक काही महिने इकडे ह्या डोंगरमाथ्यावर येउन वस्ती करतात आणी काही महिन्यांनी पुन्हा श्रीनगरला परत जातात. वर त्यांचं अख्खं गाव वसलेलं असतं.. मी ऐकून अवाक झाले. पण पुढे श्रीनगर गुलमर्ग ला १० हजार फुट उंचावर बर्फात अर्ध्यावर बुडालेली त्यांची घरं बघितली तेव्हा खात्री पटली.




वळणाच्या वाटेने पुढे निघालो.. सोबत एक नदीही आहे.. आम्ही गेलो तेव्हा पाणी फारच थोडं होतं झर्‍याईतकं .. पण दुध नुसतं..पांढरं शुभ्र. "इसे दूध गंगा कहते है " घोडेवाल्याने सांगितलं. ह्या साडेतिन किलोमिटर मध्येही काही ठिकाणी चढणीला रस्त्याचं काम सुरू होतं चढणिची वळणं म्हणजे हेयर् पिन टर्न्स.. घोड्यावरून जाताना भयानक भिती वाटत होती. पोटात गोळा येऊन कधी एकदा उतरु असं व्हायचं.

दूध गंगेचा खळाळता प्रवाह

अखेरीस उंच काही पायर्‍या दिसू लागल्या आणी घोडा थांबला. गुफा दिसली. साधारण साठ एक पायर्‍या चढून गेल्यावर गुहेला सुरुवात होते. गुफेचं प्रवेशद्वार पंधरा फुट रुंद आणी विस फुट उंच. पुढे मोठ्ठ असणारं गुहेचं मुख पाहून कल्पनाही येत नाही पुढचा अर्धा तास आपण कुठे आणी कसे जाणार आहोत ते. अनायसे लोकांच्या मुखातुन जय भोले बाबा की ! जय भोले जय भंडारी !.. असे सुरु होते.गुहेच्या डाव्या बाजूला एक बाबा भस्म विभूती लाउन धूनी लाउन बसलेले. त्याना नमस्कार केल्यावर ते भाविकांच्या कपाळाला आशिर्वादात्मक विभूती लावतात.

गुहेचे मुख्य प्रवेशद्वार

मग सुरु होतो तो अरूंद गुहेचा प्रवास. गुहेत बराच अंधार आहे. आता ठिकठिकाणी लाईट लावलेले आहेत. बरेचदा आपल्या डोक्याजवळच येतात. आपल्याकडे एखादा टॉर्च ठेवायला हवा अश्या ठिकाणी. मला प्रथमतः खुप भिती वाटली ह्या अश्या अरूंद गुहेत आपण जातो आहोत.. घुसमटलो तर काय ? लाईट गेले तर काय ? पण अश्या ठिकाणी कुठे जाउन बसले असतिल शंकर ही उत्सुकताही तितकीच होती. बरेचदा प्रबळ ईच्छाशक्तीच आपलं बळ बनते.

साधारणतः १०० मिटर दूर अंतर कधी पुर्ण झोपून तर कधी वाकून तर कधी तिरकं तारकं होउन आणि कधी पाच सात पाहिर्‍या चढून पार करत होतो. मध्येच एक बर्‍या पैकी रुंद ठिकाणी काही लोक छोटी छोटी दगडं रचून काहितरी करत होते. मी कुतुहलानं विचारलं असता असं समजलं की इथे ह्या छोट्याश्या दगडांनी जो घर बनवतो त्याला भोले बाबा खुदका बडा घर देते है सगळे बनवत होते मग आम्हीही बनवलं. मजल दर मजल करत शेवटी मंदिरात.. गुहेत पोहोचलो. निसर्गाचा चमत्कारच तो. समोरच लगेच शिवलींगाचं दर्शन घडतं. भगवान आशुतोष औघड़दानी बाबा शिव. शिव लिंगावर कामधेनू गाईची आकृती आपोआप तयार झालेली दिसते. तिच्या थनातून शिवलिंगावर सतत जलाभिषेक केल्यासारखे पाण्याचे थेंब अहोरात्र पडत असतात.

शिवलिंगाच्या डाव्या बाजूला पिंडिच्या रुपात पार्वतीचे दर्शन होते. कार्तिकेयाच्या मुर्तीच्या दोन फुट उंचावर पंचमुखी गणेश विराजमान आहेत. इथेच एक शंखाचं चिन्ह बनलेलं आहे. पुजारी सांगत होते की इथे ८४ कोटी देवता वास करतात. आता सुधारिकरणात मुख्य गुहेत ज्याला मंदीर म्हणतात त्या साधारण दहा बाय दहा च्या ठिकाणी फरश्या बसवलेल्या आहेत पण गुहेत वर बघितल्यास निसर्गाची किमया अद्भूत वाटते. गुहेच्या खडकांचे तर्‍हे तर्‍हेचे आकार नकाशे बघुन आपल्यासारख्या भाविकांना तिथे शंकर बप्पाचा शेषनाग दिसतो तर कुणाला कार्तिकेयाचा मोर. त्रिशूल शेषनाग आणी संपुर्ण दरबार तर आपल्याला पुजारीच दाखवतात गुहेची माहिती देताना. ह्याच गुहेत महाकाली महासरस्वती आणी पाच पांडवांच्या पिंडी सुद्धा आहेत. उजव्या बाजूला गौरी कुंड, गौरी गणेश, लक्ष्मी नारायण आहेत. ह्याच गुहेतला रस्ता पुढे अमरनाथ ला जातो. पण सध्या तो बंद करून ठेवला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं.

दर्शन झालं सगळं डोळ्यात आणी मनात साठवून ठेवलं. आता परत कसं जायचं ? पुन्हा त्याच अवघड वाटेने ? तर नाही.. भाविकांच्या सोईसाठी दोन मिनिटात बाहेर येता येईल असा मोठा मार्ग क्रूत्रिम गुहा आता तिथे बनवलेली आहे. तिकडून आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय एक गुजराथी शेठ आपल्या शेठाणीला ह्याच मार्गाने आत दर्शनाला घेउन जात होता. क्या करे साईज मेटर् करता है नी.. स्मित करीत म्हणाला.

दर्शन करून बाहेर येईपर्यंत दुपारचे चार होउन गेले होते. आज जेवण झालेच नव्हते. पुन्हा घोडयावरून खाली उतरून बाहेर आलो. तर बस फारच दूर उभी आहे असं सहप्रवाशांनी सांगितलं. मग बस कडे चालत जाता जाता वाटेत जी चार दोन दुकानं वजा हॉटेल्स दिसली तिथे चौकशी करत करत एका ठिकाणी मस्त पैकी गरमा गरम पोळी - भाजी (चपाती-सब्जी) आणि चहा घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. अन्धार वाढत चालला होता आणी डिसेंबर एन्ड ची थंडी.. धुकंही.

सकाळी कंडक्टर ने सांगितल्या प्रमाणे अजुन एक दोन ठिकाणी गाडी थांबणार होती. एक मन वाटत होतं नको आता उतरायला थंडी मी म्हणत होती. पण बरेच जणांनी सांगितलं होतं नौ देवीया नक्की बघून या.कट्रापासून ५ कि. मी. वर आगार जितो नामक एक स्थान आहे. असं म्हणतात की ह्या ठिकाणी जितो बाबांना साक्षात वैष्णोदेवी ने दर्शन दिलं होतं. इथे एक बावडी -विहीर आहे. ज्या कुणा स्त्रियांची मुलं जगत नाहित त्यांनी जर पौर्णिमेला इथे स्नान करून विभूती लावली तर त्या सुखी होतात असं मानतात. म्हणून इथे पौर्णिमेला भाविकांची आणि श्रद्धाळूंची गर्दी असते. ह्या जितो बाबाचं आम्ही बसमधूनच दर्शन केलं. आणि पुढे निघालो.

आगार जितो पासून चार कि. मि. वर नौ देवियां नावाचं एक ठिकाण आहे. ह्या ९ देवी पिंडीच्या रुपात एका गुहेत स्थित आहेत. रस्त्यापासून जरा आत थोड्याश्या पायर्‍या उतरून गेलं की ही गुहा आहे. पायर्‍यांच्या उजव्या बाजूला जुळझुळ पाणी वहात होते. पायर्‍याही ओल्याच होत्या. आणी लाईनमध्ये उभं राहून थंड बर्फासारख्या पाण्यात पाय झोंबत होते. ह्या गुहेत जायला अतिशय अरुंद रस्ता आहे आणि गुहासुद्धा इतकी छोटीशी आहे की एकावेळी जेमतेम दोन तिन जण आत असू शकतिल.. अर्धवट बसू शकतिल.. उभे रहाणे तर शक्यच नाही. म्हणून गुहेबाहेरची रांग पुढे सरकायला इतका वेळ होत होता. ह्या नौ देविया च्या गुहेतही निसर्गनिर्मित तर्‍हेतर्‍हेचे आकार आहेत.. गणपती, झोपलेला मारुती, कबुतर, लक्ष्मिच्या पावलाचा ठसा आहे. आत गुरूजी बसलेले असतात आणी आपल्याला हे सगळ सांगुन म्हणतात "अपनी इच्छासे जो भी चढाना है चढाईये !" भक्तही हे सारं गुहेतलं निसर्ग निर्मित वैभव बघून खुष.

चलो चलो लेट हो गये है कंडक्टर चा आवाज आला. बसकडे निघालो. दुसर्‍या दिवशी पुढे श्रिनगर ला निघायचं होतं. रात्र आणी थंडी वाढत चालली होती आणी दिवासभराचा थकवाही. बसमध्ये केव्हा झोप लागली कळलेही नाही.


गुहेमधिल काही फोटो नेटवर सापडलेले.

गुहेमधिल शिवलिंग

गुहेत जाण्याची अवघड वाट





1/13/2009

प्राक्तन . . .

तुझं माझं अस्तित्व

आकाशात शोधताना

प्राक्तनच रूसून बसलं

रेषा रेषा जुळवताना . . .

स्पंदन . . .

नात्यांना नसावीत नावे

असावा फ़क्त अर्थ

मनातल्या स्पंदनाशिवाय

नात्यांचं अस्तित्वच व्यर्थ . . .

रानफूल . . .

वार्‍याच्या त्या स्पर्षानं

रानफूल वेडं उमललं

त्याच्या सोबत डोलताना

फुलायचं कसं विसरलं ?

स्वप्नओंजळ . . .

पहाटे उगवत्या क्षितिजावर

दवांत भिजूनी रात्र सरते

हताश माझ्या स्वप्न ओंजळी

नुसतेच दाट धुके उरते . . .

आंदण . . .

शब्द मी जपून ठेवले
आजच्या आपल्या भेटी साठी
तूच त्यांना दिलंस आंदण
कुणा एका अबोली साठी . . .

निवडुंग . . .

काट्याचं टोचणं
तसं नित्य होतं
निवडुंगाचं फ़ुलणं
मला नवं होतं . . .

ब्रह्मसंबंध . . .

नियतिच्या काळोखात
माझ्या स्वप्नांचा गाव
प्राक्तनाचा उसनाच
ब्रह्मसंबंधाचा आव !

आस . . .

विखूरलेली सारी स्वप्नं
अन उसवलेला माझा श्वास
रितंच सारं आयुष्य
तरीही जगण्याची खुळी आस . . .

1/12/2009

गोठणं

जडावलेल्या पापणीत

आसवांचं गोठणं

तुला शोधत तुझ्यासवे

माझी मी हरवणं . . .

विरस

तुझ्या आठवांची
अंतरी पुसट खूण
क्षितिजाशी रेंगाळणारं
विरस बावरं उन . . .

एक रात्र

एक रात्र मनातली
स्वप्नं दवांत भिजलेली
चांदण्या मुठीत घेउन
आकाश पांघरून निजलेली

एक रात्र अशीच
आकाश पांघरून निजलेली
गात्र-न-गात्र चेतवून
तुझ्या मिठीत विझलेली . . .

मोती

चांद खुणवी नभातून
चांदण्या देह जाळती
जडावल्या पापण्यांतून
निसटून जाई मोती

अंगोपांगी

सूर्यास्ताला एक क्षण

तुझ्या मिठीत मिटला

तरसण्याचा अनुभव देऊन

माझ्या अंगोपांगी भिनला . . .

देहभान

आकंठ श्वास

उन्माद बेभान

तुझेच आभास

हरपतं देहभान . . .

प्रीत पावरी

अर्णवाची जशी
लाट मुकी बावरी
माझ्या ओठी सखया
तुझीच प्रीत पावरी. . .

अनावर

कुंतलात रात गुंतली
तुझ्या अधरांची धुंदी
अनावर पहाटेची
सूर्योदयाला बंदी. . .

मदालस

मदालस स्पर्ष तुझा

बावर्‍या तनूवर

विसावतो रोम- रोम चेतवून

श्वास माझा उसवतो. . .

सुखाचा सोहळा

थरारल्या पापण्यांत
स्वप्नांचा हिंदोळा
काय सांगू सखे
सुखाचा सोहळा . . .

दूर देशी

पुन्हा कसं येइल
नभी चांदणं भरून
कुठे दूर देशी आता
चंद्रच गेला निघून . . .

मोहोरसुगंधी

दिठी-दिठी तुझे भास

स्पर्ष मोहोरसुगंधी

सायवाळल्या ओठांना

आर्त अनोखी धुंदी...

आरस्पानी

स्वप्न डोहाच्या तरंगी
तुझे भास आरस्पानी
चंद्राच्या कुशीत मिटली
एक अबोल चांदणी...

चांदणभूल

सरू नये आज निशा
स्वप्नी येता तुझी चाहूल
मोहरल्या दाही दिशा
की ही नवी चांदणभूल ?

1/09/2009

प्राजक्त मला गवसलेला . . . माझ्या अंगणातला . . .

आकाशीचं चांदण
लेऊनअंगणातला प्राजक्त
सारं देणं धरतीला देऊन
पुन्हा एकदा विरक्त . . .


माझ्या अंगणात बरसलेला
मुक्या प्राजक्ताचा बहर
सार्‍या चांदण्याच दुरावल्या
असा आकाशाचा कहर . . .


सजून येईल निशा

प्राजक्त वेडा फुलेल

चांदण्यांची मधूशिंपण

पुन्हा धरेवर घालेल . . .